मुंबई (वृत्तसंस्था) – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. देशमुख यांच्या नागपूरमधील निवासस्थानी सक्तवसुली संचालनायलयाने (ईडी) छापा टाकला आहे.
शुक्रवारी सकाळी ईडीने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील निवासस्थानी तसेच त्यांच्या निकटवर्तीयांकडे छापे टाकले. त्यामुळे अनिल देशमुख यांचा पाय आणखी खोलात जाणार असल्याचे दिसत आहे. याबद्दल भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी एक मोठं विधान केलं आहे. काही दिवसांनी अनिल देशमुखांची रवानगी तुरूंगात होणार असल्याचं सोमय्यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले किरीट सोमय्या
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे वसूली मिनिस्टर अनिल देशमुखांच्या घरी ईडीने छापा मारला. मला खात्री आहे काही दिवसांनी ते तुरूंगात असतील. त्यांच्याच प्रमाणे अनिल परब यांच्यावर देखील अशीच कारवाई होणार आहे.
दरम्यान, गुरूवारी रात्रीच ईडीचे पथक मुंबईहून नागपुरात दाखल झाले होते . शुक्रवारी सकाळी स्थानिक ईडी अधिकाऱ्यांच्या मदतीने मुंबईतील पथकाने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील घरी व निकटवर्तीयांकडे धाड टाकली.
१६ जूनला ईडीच्या तीन पथकांनी अनिल देशमुख यांच्याशी संबंधित दोन सीए व एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरीही छापे टाकले होते. ईडी देशमुख यांच्याकडेही झाडाझडती घेण्याची शक्यता या छाप्यांमुळे बळावली होती. अवघ्या नऊ दिवसातच ईडीने हा छापा टाकला आहे.