नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- देशातील क्रीडा क्षेत्राचा सर्वोच्च समजला जाणारा खेलरत्न पुरस्कार मिळाल्यामुळे अर्जुन पुरस्कारासाठी विचार केला गेला नसल्याने ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिकने निराशा व्यक्त केली आहे. तसेच हा पुरस्कार मला कधीच मिळणार नाही का, असा प्रश्न तिने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच विचारला आहे.
अर्जुन पुरस्काराच्या यादीत नाव नसल्याने रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील ब्रॉंझपदक विजेती साक्षी मलिक हिने केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या निर्णयावर टीका केली आहे. तसेच आता हा पुरस्कार मिळविण्यासाठी मी आणखी कोणते पदक मिळवू, असाही प्रश्न तिने केला आहे.
मला 2016 साली खेलरत्न पुरस्कार मिळाला. त्याचा अभिमानच आहे. देशाच्या क्रीडाविश्वातील सगळे पुरस्कार मिळविण्याचे माझे स्वप्न आहे. केवळ खेलरत्न मिळाला म्हणून आता अर्जुन मिळणार नाही हा अनाकलनीय नियम आहे. मला अर्जुन पुरस्कार मिळावा हे माझे स्वप्नही आहे. मात्र, आता हा पुरस्कार मिळवायचा असेल तर मला आणखी कोणते पदक किंवा स्पर्धा जिंकावी लागेल की त्यानंतरच माझा या पुरस्कारासाठी विचार केला जाईल, अशी विचारणाही साक्षीने पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच या पुरस्कारांबाबत निर्णय घेणारे केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजीजू यांना केला आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्मा याच्यासह पाच क्रीडापटूंना यंदाचा खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. तसेच वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा व महिला क्रिकेटपटू दीप्ती शर्मा या दोन क्रिकेटपटूंना अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले. यंदा प्रथमच पाच खेळाडूंना खेलरत्न, 13 प्रशिक्षकांना द्रोणाचार्य, 27 क्रीडापटूंना अर्जुन, 15 खेळाडूंना ध्यानचंद तर, 8 खेळाडूंना तेनसिंग पुरस्कार जाहीर झाले. मात्र, सर्वोच्च सन्मान समजला जात असलेला खेलरत्न पुरस्कार मिळाल्यामुळे कुस्तीपटू साक्षी मलिकसह वेटलिफ्टर मीराबाई चानू यांना अर्जुन पुरस्कार देता येणार नाही, असा निर्णय रिजीजू यांनी घेतला. त्यामुळे निवड समितीने शिफारस करूनही या दोन्ही खेळाडू निराश झाल्या. त्यानंतर चानूकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नसली तरी साक्षीने ट्विटरद्वारे थेट पंतप्रधानांनाच याबाबत विचारणा केली आहे.