मुंबई ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीकडे भाजप नेत्यांनी पाठ फिरवली . राज्यातील अजानचा भोंगा बंद होणार नसल्याची भूमिका सर्वपक्षीय बैठकीत घेतली गेल्याची माहिती गृहमंत्री वळसे-पाटील यांनी दिली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेला 3 मे चा अल्टिमेटम कायम असल्याचं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी जाहीर केलंय.
या बैठकीनंतर बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांनी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिलाय तो कायम असल्याचं म्हटलंय.सरकारनं ठरवलं पाहिजे कशाप्रकारे मार्गदर्शक सूचना असाव्यात. आमच्या 3 मे चा अल्टिमेटम कायम आहे, असं नांदगावकर म्हणाले.
सर्वपक्षीय बैठकीनंतर वळसे-पाटील म्हणाले की, बैठकीत साधकबाधक चर्चा झाली. आता प्रश्न असा आहे की, लाउडस्पीकरचा वापर या संदर्भात सुप्रीम कोर्टाने 2005 मध्ये निर्णय दिला आहे. त्यानंतर सुद्धा अन्य काही न्यायालयाने निर्णय दिले आहेत. त्या आधारे महाराष्ट्र सरकराने 2015 ते 2017 या कालावधीत काही जीआर काढले आहेत. त्याच्या आधारे लाउडस्पीकरचा वापर, त्याला द्यायची परवानगी, अटी-शर्थी, वेळ आणि डेसिबलच्या आवाजाची मार्यादा या गोष्टी स्पष्ट केल्यात. त्याच्या आधारे आजपर्यंत हा वापर सुरू असल्याचे वळसे-पाटलांनी सांगितले.
या संदर्भात केंद्र सरकराने राष्ट्रीय पातळीवर काही निर्णय घेतला, प्रत्येक राज्यात वेगळी परिस्थिती राहणार नाही. अशी आवश्यकता असेल, तर सर्व पक्षांनी एक शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांना भेटावे. भूमिका स्पष्ट करावी, असं आवाहनही वळसे-पाटील यांनी केलंय.