जळगाव ( सोनम पाटील ) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ६५० किलो बॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प आस्थपित करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने ३ कोटी ६६ लाख ७१ हजार ९६० रूपयांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. अशी माहिती कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी
यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विद्यापीठात सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित करण्यासाठी विद्यापीठाने ९ मार्चरोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला होता. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण कार्यालयाला सर्वेक्षण व अंदाजपत्रकाचे निर्देश दिले. महाऊर्जाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी सर्वेक्षण व प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केल्यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या लेखाशिर्षात असलेल्या अपारंपरीक ऊर्जा विकास अनुदान योजनेतून हे अनुदान देण्यास प्रशासकीय मान्यता दिलेली आहे.
कॅपेक्स मोड (भांडवली खर्चाचे मॉडेल) पध्दती अंतर्गत ६५० किला वॅट क्षमतेच पारेषण संलग्न सौर ऊर्जा प्रकल्प आस्थपित केला जाणार आहे. या प्रकल्पामुळे विद्यापीठात मोठ्या प्रमाणात विजेची बचत होणार आहे. सद्या विद्यापीठाला २ हजार किलो वॅटचा मंजूर अधिभार आहे. हा प्रकल्प सुरु झाल्यानंतर किमान एक तृतीयांश वीजेची बचत होणार आहे. पहिल्या टप्प्यात विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत प्रकल्प कार्यान्वीत केला जाणार आहे. निधी प्राप्तः झाल्यानंतर कामाला सुरूवात होईल. अशी माहिती कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी दिली.
दोन वर्षापासून कोविड-१९ च्या महामारी मुळे विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ऑनलाईन घेण्यात येत होत्या मात्र विद्यापीठाच्या परीक्षा आता ऑफलाईन घेण्याचा निर्णय आज परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचे प्रा. माहेश्वरी यांनी सांगीतले. विद्यापीठाव्दारे घेण्यात येणाऱ्या उन्हाळी २०२२ च्या लेखी परीक्षा बहुपर्यायी स्वरुपात ऑफलाईन पध्दतीने विद्यापीठाने ठरवून दिलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात येतील. पदवीस्तरावर ६० गुणांची ही परीक्षा ९० मिनीटांची असेल. प्रत्येक प्रश्नाला एक गुण राहील व सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य असेल. या परीक्षेकरीता निगेटीव्ह पध्दत लागू राहणार नाही.पदव्युत्तर स्तरावर ६० गुणांची परीक्षा १२० मिनिटांची असेल. प्रत्येक प्रश्नाला एक गुण राहील व सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य असेल. या परीक्षेकरीता निगेटीव्ह मार्कीग पध्दत लागू राहणार नाही. बहिस्थ अभ्यासक्रमाच्या पदवी व पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांची परीक्षा १०० गुणांची व १२० मिनीटांची असेल. एकूण ५० प्रश्न असतील व प्रत्येक प्रश्नाला २ गुण राहतील. आर्किटेक्चर अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षा प्रचलित पध्दतीने दीर्घोत्तरी ऑफलाईन घेण्यात येतील. प्रात्यक्षिक व मौखिक परीक्षांचे आयोजन हे प्रचलित पध्दतीने ऑफलाईन करण्यात येईल. अंतर्गत परीक्षा देखील प्रचलित पध्दतीने शक्यतो दीर्घोत्तरी घेण्यात येतील. पुढील वर्षाच्या म्हणजे २०२२-२३ मधील हिवाळी व उन्हाळी परीक्षा या पूर्वीच्या प्रचलित पध्दतीने दीर्घोत्तरी घेण्यात येणार असल्याचे कुलगुरुंनी सांगितले.
या वर्षी युवक महोत्सव घेण्याचा निर्णय झाला आहे. काल आंतरमहाविद्यालय युवक महोत्सव युवारंग २०२१ च्या आयोजनासाठी समितीची बैठक झाली. साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय व कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, शहादा यांनी दिलेल्या संयुक्त प्रस्तावावर चर्चा करण्यात आली आणि १८ ते २१ एप्रिल, २०२२ या कालावधीत शहादा येथील साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात हा महोत्सव घेण्याचा निर्णय झाला आहे, असे कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी यावेळी सांगितले.
या पत्रकार परिषदेला प्रभारी प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, प्रभारी कुलसचिव प्रा.के.एफ.पवार, प्रभारी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. दीपक दलाल, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ. सुनील कुलकर्णी, विद्यापीठ कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील उपस्थित होते.