मुंबई ( प्रतिनिधी ) – राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. दरम्यान विधानभवनाबाहेर एका शेतकऱ्याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.
सुभाष भानूदास देशमुख, असे या शेतकऱ्याचे नाव आहे. गंभीर भाजलेल्या या शेतकऱ्याला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानामुळे देशमुख यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. देशमुख हे साताऱ्याच्या कांदळगावचे रहिवासी आहेत.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान सुरू असताना विधिमंडळाबाहेर हा प्रकार घडला तीन दिवसांपासून विरोधकांच्या आरोप-प्रत्यारोपांनी अधिवेशन गाजत आहे. राज्यात ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. अनेक गावांमध्ये शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे. काही गावांमध्ये जनावरं दगावली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी विरोधकांकडून विधानभवनात करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सरकारवर टीका केली आहे. राज्यातील शिंदे-भाजपा सरकार असंवेदनशील आहे. त्यांच्या कृत्यामुळेच राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ भरपाईची मागणीही त्यांनी केली आहे.