जळगाव (प्रतिनिधी) – बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आर. ओ. तात्यासाहेबांच्या रूपाने पहिला आमदार पाचोऱ्याला मिळाला. मग तालुक्यात विकासाची घौडदौड सुरु झाली. उद्योग व्यवसायातही तात्यांनी भरारी घेतली. शिवसेनेने भरभरून दिले मात्र तात्यांच्या घरात गद्दारी निघाली. पुतण्याने तत्वांशी प्रतारणा केली असली तरीही आपण शिवसैनिक मात्र तात्यांचा अन शिवसेनेचा वारसा पुढे नेणार आहोत, असे प्रतिपादन शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी केले.
पाचोरा येथे उद्धव ठाकरे यांची राज्यातील तिसरी जाहीर सभा पार पडत आहेत. त्यावेळी शिवसेना नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी सभेत जोरदार भाषण केले. जे गेले ते जाऊ द्या ती जीर्ण पाने होती, आता नवीन इतिहास घडवूया, हि तात्यांची शिकवण आहे. पाचोऱ्यात उद्या भगवी पहाट उगविल्याशिवाय राहणार नाही.
जिल्ह्यात शिवसेनेची मोठी परंपरा आहे. अनेक नेत्यांनी शिवसेना मोठी केली. शिवसेना पक्षाचा वटवृक्ष मोठा केला. आर. ओ. तात्यांनी त्याला हातभार लावला. तात्यांच्या कामाचा हुरूप पाहून पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाचोऱ्यात सभा घेतली. सभा प्रचंड प्रतिसादात पार पडली, असेही त्या म्हणाल्या.