जळगाव (प्रतिनिधी) – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची थोड्याच वेळात पाचोरा येथे सभा सुरु होत आहे. तत्पूर्वी उपनेत्या सुषमा अंधारे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. शिंदे गटाचे आ. किशोर पाटील यांना उद्देशून, आप्पा मारू नका विनाकारण गप्पा, तुमच्यावर लागला आहे गद्दारीचा ठप्पा अशा शब्दात घणाघात करीत आर. ओ. तात्यांना “राजकीय वारसा किशोर पुढे नेईल” हा त्यांचा तुमच्याप्रती असलेला विश्वास तुम्ही घात केला या शब्दात प्रहार केला.
पाचोरा येथे उद्धव ठाकरे यांची राज्यातील तिसरी जाहीर सभा पार पडत आहेत. त्यावेळी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी विरोधकांवर शाब्दिक प्रहार केला. आपला वारसा पुतण्या पुढे नेईल असा आर. ओ. तात्यांना विश्वास होता. मात्र “खोक्यां”पुढे पुतण्याने वारसा सोडून दिला. मात्र त्यांच्या कन्या वैशाली सूर्यवंशी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या आहेत. त्यांच्या पाठीशी पक्षप्रमुख उभे आहेत. खा. संजय राऊत जळगावी आले असता, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे स्टेशन बाहेर काळे झेंडे दाखविण्याची नौटंकी केली. सभेत खुर्च्या भरणार नाही, अशी भीती आ. किशोर पाटील यांना होती. मात्र आप्पाने स्वतः यावे. खुर्च्या मोजाव्या. आम्ही अडवणार नाही. आम्ही सभ्य लोक आहोत, असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावरही त्यांनी सभेतून प्रहार केला. बालिश विधान करणारे पालकमंत्री असा उल्लेख करीत, ज्या लोकांनी हिंदुत्वाच्या गप्पा केल्या ते हिंदुत्व किती बेगडी आहे ते वारंवार दिसले. अजितदादाच्या रूपाने ज्या पक्षांतर बाबत गप्पा सुरु झाल्या त्यानुसार खोकेसुरांमध्ये चलबिचल सुरु झाली. तेव्हा त्यांच्यातील हिंदुत्व खोटे असल्याचे दिसले. गुजरातमधील वृत्तपत्रात शिंदे यांना राजीनामा तयार ठेवा अशा बातम्या आल्या होत्या, तेव्हा खोकेसुर अस्वस्थ दिसल्याचेही त्या म्हणाल्या.