जळगाव (प्रतिनिधी) – लग्न महिन्याभरावर असताना एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी २२ एप्रिल रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास नाथवाडा येथे घडली आहे. घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कितेश गौतम बागडे (वय-२०) रा. नाथवाडा, सिंधी कॉलनीजवळ, जळगाव असे मृत तरूणाचे नाव आहे. शहरातील सिंधी कॉलनी जवळील नाथवाडा येथे कितेश बागडे हा आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सध्या महाविद्यालयीन शिक्षण करीत होता. दोन महिन्यापुर्वीच त्याचा साखरपुडा झाला होता. नेहमी प्रमाणे रात्री ९ वाजता घराच्या दुसऱ्या मजल्यावर असतांना भावी पत्नीसोबत व्हिडीओ कॉलवर बोलत होता. व्हिडीओ कॉल सुरू असतांना त्याने थेट गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार कितेशची आई गुड्डी यांच्या लक्षात आल्याने त्यांनी हंबरडा फोडला.
शेजारी राहणाऱ्या तरूणांनी धाव घेवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणूका भंगाळे यांनी मयत घोषीत केले. कितेशने आत्महत्या का केली याची माहिती समोर आलेली नाही. २७ मे रोजी कितेशचे लग्न होणार होते. परंतू त्याने टोकाचे निर्णय घेतल्याने बागडे कुटुंबियांवर मोठे संकट कोसळले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई गुड्डी, वडील गौतम दयाराम बागडे, लहान भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.