नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – राज्य दहशतवादविरोधी पथकाने (ATS) हिरेन मृत्यूप्रकरणाचा यशस्वीपणे छडा लावला. मात्र, या गोष्टीवरून लक्ष विचलित करण्यासाठी विरोधकांकडून परमबीर सिंह यांच्या पत्राचा मुद्दा उचलून धरण्यात आला, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला. ATS च्या तपासाची दिशा अचूक असल्याचा मला आनंद आहे. एटीएसने दोघांना अटक केली. मुख्य केस आहे अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं आणि हिरेन हत्या ही होती. मात्र, त्यावरुन लक्ष भरकटवून विरोधकांनी परमबीर सिंह यांच्या पत्राचा मुद्दा उचलून धरला. ते चुकीचं आहे, असे शरद पवार यांनी म्हटले.

परमबीर सिंह प्रकरणात महाविकासआघाडी सरकारवर करण्यात येणाऱ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीत पत्रकारपरिषद घेऊन विरोधकांच्या आरोपांचे खंडन केले. यावेळी त्यांनी मनसुख हिरेन प्रकरणाचा यशस्वीपणे छडा लावणाऱ्या ATS चे कौतुक केले.
काल एटीएसने दोघांना अटक केली आहे. हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणात ही अटक झाली आहे. यावरुन एक स्पष्ट होत आहे, हिरेन यांची हत्या का झाली, त्यांची हत्या करणारे जे पोलीस वाटतात, त्यांना एटीएसने अटक केली. आता तपास सत्य बाहेर येईल. उद्या-परवा कधी येईल माहिती नाही. मात्र, मला आनंद आहे. परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर मुख्य प्रकरणाकडे दुर्लक्ष होताना दिसत होते, हा मुद्दा शरद पवार यांनी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी पत्रकारांनी शरद पवार यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणार का, हा प्रश्न विचारला. तेव्हा शरद पवार यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्धवत नाही, असे सांगितले. रमबीर सिंग यांनी आरोप केलेत त्या काळात अनिल देशमुख कोरोना झाल्यामुळे नागपूरच्या रुग्णालयात दाखल होते. त्यामुळे त्यांच्यावर केलेल्या आरोपांमध्ये आता ताकद राहिली नाही, अनिल देशमुख मुंबईत नव्हते, रुग्णालयात होते, त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही. जे आरोप केले त्यात तथ्यच नाही, मग चौकशीचा मुद्दा येतो कुठून, अनिल देशमुखांना हटवण्याचा प्रश्नच नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.







