जळगाव (प्रतिनिधी) – खारघरमध्ये “महाराष्ट्र भूषण” गौरव सोहळ्यात आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांचे ‘श्री’भक्त उन्हामुळे तडफडत होते आणि मुख्यमंत्र्यांसह जबाबदार मंडळी ‘एसी’त बसून श्रीखंड-पुरी खात होते. तिथला मृतांचा आकडा भयानक आहे. तो आकडा दडवला जात आहे. पालघरमध्ये दोन साधूंची हत्या झाली. तेव्हा विरोधी पक्षात असलेले देवेंद्र फडणवीस राज्य सरकारविरोधात आग ओकत होते. मग आता खारघरच्या घटनेतील गांभीर्य लक्षात घेऊन व जबाबदारी म्हणून मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.
रविवारी उद्धव ठाकरे हे जळगाव दौऱ्यावर येत आहेत, त्यापार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी राऊत शुक्रवारी रात्री जळगावात आले. शनिवारी सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
संपर्क प्रमुख संजय सावंत, संघटना विस्तारक गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, गजानन मालपुरे आदी उपस्थित होते. अजितदादांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इछेप्रकरणी राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा कुणाच्या मनात नसते. अजित पवार मात्र सर्वार्थाने अनुभवी आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी सक्षम आहेत. त्यांनी इच्छा व्यक्त केली असेल तर माझ्या त्यांना शुभेच्छा आहेतच, अशी शब्दात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी येथे भूमिका मांडली. गतकाळात मात्र तोडफोड करुन लायकी नसलेलेही मुख्यमंत्री झालेत, अशी पुष्टी जोडत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिमटा घेतला.