अमळनेर ( प्रतिनिधी ) – प्रति पंढरपूर अमळनेरात बोरी नदीपात्रातील संत सखाराम महाराज यात्रोत्सवाचा उत्साह वाढतच आहे. दोन वर्षांपासून कोरोनामुळे यात्रा बंद होती. मात्र, यंदा यात्रोत्सवात नागरिकांसह व्यावसायिकांमध्ये उत्साह आहे.
यात्रेत पालखी सोहळा आटोपल्यावर धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक येथील भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. खान्देशातील हा सर्वात शेवटचा यात्रोत्सव असल्याने भाविक आवर्जून लालजींच्या दर्शनाचा लाभ घेतात. यंदाही बोरी नदीचे पात्र खेळणी, खाद्यपदार्थांची दुकाने, पाळण्यांनी सजले आहेत.
दररोज भाविकांची प्रचंड गर्दी उसळत असून यात्रेतील व्यावसायिक व विक्रेते चांगलेच सुखावले आहेत. दररोज लाखो रूपयांची उलाढाल होत आहे. भाविकांची गर्दी असल्याने अक्षरशा दोन्ही पुलाकडे आपली वाहने पार्किंग करावी लागत आहेत. मोठे पाळणे झुले मौत का कुवा हा स्पेशल शो यासह इतर शोसाठी बराच वेळ वाट पाहावी लागत आहे. खाद्यपदार्थांची दुकाने कोल्ड्रिंक्स थंडपेय दुकाने व मीना बजार देखील हाउसफुल असून दररोजच्या उपयोगी वस्तू खरेदीसाठी देखील महिलांची गर्दी होत आहे.
श्री संत सखाराम महाराज यात्रेला मोठ्या उत्साहात भक्ती भावाने सुरवात झाली आहे. रथाची वाडी संस्थान मधुन ह.भ.प गादीपदी प्रसाद महाराज, आ.अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा करून जागेवरून रथ हलविण्यात आला. युथ फाउंडेशन तर्फे रथावर फुलांचा वर्षाव करून हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन घडवणारा प्रसंग यावेळी दृष्टीस पडला.
यात्रोत्सवात सर्वधर्मीय समाजबांधव परंपरेनुसार जबाबदाऱ्या पार पाडतात. त्यात महाजन-माळी, पाटील, वाणी, शिंपी, धनगर, ब्राह्मण, बेलदार, नाभिक, भोई, बंगाली ब्राह्मण, मुस्लिम बांधव सहभागी होतात. अनेकजण घरून डबे आणून नदीपात्रात सहकुटुंब न्याहारीचा आनंद घेत आहेत. उत्तम नियोजन आणि पुरेसा पोलीस बंदोबस्त आहे.