दीड तासातच पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात
जळगाव (प्रतिनिधी) – शहरात गेंदलाल मिल येथील रहिवासी तरुणाचा शाहूनगर परिसरामध्ये तीक्ष्ण हत्याराने वार करून खून झाल्याची घटना बुधवार २० जुलै रोजी उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी संशयित तीन जणांना सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील शाहू नगर भागातील जळकी मीलच्या मोकळ्या जागेत चौघे जण दारू पित असतांना त्यांच्यात कुठल्यातरी कारणावरून वाद झाला. यात दारूच्या नशेत असतांना तिघांनी रमा उर्फ रहीम शहा मोहम्मद शहा (वय-२५) रा. गेंदालाल मील या तरूणाचा तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करून खून केल्याची घटना बुधवारी २० जुलै रोजी दुपारी ३ वाजता घडली. पोलीसांनी दीड तासातच तिघांना ताब्यात घेतले आहे.
रहीम शहा उर्फ रमा मोहम्मद शहा (वय-२५) रा. गेंदालील मील, जळगाव असे मृत तरूणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात वडील, पत्नी, तीन मुले, एक बहीण असा परिवार आहे. तो गेंदालाल मिल परिसरात पत्र्याच्या झोपडीत राहत असल्याची माहिती नागरिकांनी दिली.
रहीम शहा हा मालधक्क्यावर हमालीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. बुधवारी २० जुलै रोजी कामावर सुटी असल्याने सहकारी पवन किसन लाडे (वय १९), मनोज जलाल गायकवाड( वय ४२) आणि विलास तुकाराम निकम (वय ३४) तिघे रा. गेंदालाल मील, जळगाव यांच्यासोबत दुपारी ३ वाजेच्या सुमारास जळकी मील परिसरात गेले होते. तेथे मोकळ्या जागेत रेल्वे रूळाजवळ दारू पिण्यासाठी बसले. यात रहिम शहा याचा तिघांशी वाद झाला. त्यात त्याचा तीक्ष्ण हत्याराने भोसकून खून केला आणि पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीसांनी रेल्वेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानुसार तपासाची चक्रे फिरवत पवन किसन लाडे, मनोज जलाल गायकवाड आणि विलास तुकाराम निकम तिघे रा. गेंदालाल मील यांना खानदेश सेंट्रल परिसरातून अटक केली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
पोलिसांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविला. सीएमओ डॉ. नीता भोळे यांनी त्यास तपासून मयत घोषित केले. त्या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, मयत रहीम शहा याच्यावर सुमारे ३२ ते ३५ वार झाल्याची माहिती मिळाली.