मुंबई (प्रतिनिधी) – महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमात खारघर येथे उष्माघातामुळे १४ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे राज्य सरकारवर संतप्त टीका होत असतानाच आता या मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा पोस्ट मॉर्टम अहवाल आला आहे. या अहवालात अनेक धक्कादायक बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. खारघर घटनेप्रकरणी शिंदे सरकार टीकेचे धनी ठरले आहे.
कार्यक्रमाच्या ठिकाणी कडक ऊन आणि गर्मी असलयामुळे मृतांच्या शरीरात पाण्याचा थेंबही नव्हता असं स्पष्ट झालं आहे. मृत्यू पावलेल्या १४ पैकी १२ जणांनी सहा ते सात तासांपासून काहीच खाल्लेले नव्हते, असे या अहवालात म्हटले आहे. या मृतांपैकी काही जण आधीच आजाराने त्रस्त होते, त्यातच डोक्यावर कडक ऊन आणि पोटात काही नसल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये समोर आली आहे.
विशेष म्हणजे, हा कार्यक्रम ज्या ठिकाणी होता तेथे आदल्या दिवशी काही अधिकारी पाहणी करण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांनाही उन्हाचा त्रास झाला होता. मात्र, त्यांनी ही गोष्ट वरिष्ठांच्या कानावर घातली नाही असे आता समोर येत आहे. दरम्यान या दुर्घटनेनंतर आता राज्य सरकारला उपरती झाली असून सरकारने काही महत्वाचे निर्देश दिले आहेत. शासनाने दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत खुल्या जागेत कोणतेही कार्यक्रम आयोजित करू नयेत, असे म्हटले आहे.