चोपडा (प्रतिनिधी) – शेतकऱ्याच्या गावाबाहेर खळ्यात बांधलेल्या गोऱ्हावर बिबट्याने हल्ला चढविल्याची घटना उघडकीला आहे. घटना तीन दिवसांपूर्वी शनिवारी रात्री घडली असून यात गोऱ्हा ठार झाला आहे. घटना पुनगाव येथे शनिवारी रात्री सुर्यभान युवराज बाविस्कर यांच्या शेतात घडली. शेतकऱ्याचे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
आतापर्यंत बिबट्याने सात वेळा या परिसरात हल्ला करून दहा जनावरे ठार केल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. रविवारी सकाळी शेतकरी सुर्यभान बाविस्कर खळ्यात गेले असता त्यांच्या लक्षात आले. त्यांनी वनविभागाला ही माहिती दिली. वनरक्षक सुमित्रा पावरा यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
पुनगाव परिसरात तापीनदी असून या तापी नदीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून हा बिबट्या वावरत असतो त्याने आतापर्यंत सहा वेळा हल्ला करून आठ जनावरे ठार केली आहेत. याबाबत ग्रामस्थ व सरपंच यांनी वनविभाग अधिकाऱ्यांना अनेक वेळा बिबट्याचा बंदोबस्त्याची मागणी करूनही त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. म्हणून शेतकऱ्यांची एवढी जनावरे ठार झाली असून त्यांचे नुकसान झाले आहे. परंतु आता तरी वनविभागाने गांभीर्याने लक्ष देऊन त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी पुनगाव सरपंच किशोर बाविस्कर यांनी केली आहे.
आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात जनावरांचे नुकसान झालेले शेतकऱ्यांमध्ये नामदेव धुडकु सपकाळे १ गाय, राजू एकनाथ कोळी १ म्हैस, हिरामण उत्तम बाविस्कर दोन बैल एक म्हैस, हरी बाविस्कर १ बैल, विकास लक्ष्मण खांजोडे १बकरी, निवृत्ती जगन्नाथ सोनवणे १ बैल अशी एकूण आठ जनावरे बिबट्याने ठार केली आहेत. त्यामुळे वन विभागाने बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी पुनगाव ग्रामस्थ करीत आहे.