जळगाव ( प्रतिनिधी ) – गेल्या जवळपास ३३ दिवसांपासून कुसुंबा खुर्द गावात पाणीपुरवठा झालेला नसल्याने आज महिलांच्या संतापाचा उद्रेक झाला . सुमारे शेकडो महिलांनी सकाळीच ग्रामपंचायत कार्यालय गाठून सरपंच आणि सदस्यांना जाब विचारायचा आहे , त्यांना बोलवून घ्या अशी आग्रही मागणी केली . आपल्या समस्येची समाधानकारक उकल होत नसल्याचे लक्षात आल्यावर या महिलांनी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले .
फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे पैसे नाहीत , पाणीपुरवठा योजनेचे वीज बिल भरायला पैसे नाहीत अशी कारणे सांगितली जात आहेत . ग्रामपंचायत या अडचणींचा काहीच विचार करणार नसेल तर ग्रामस्थांनी पाण्याची आशा सोडून द्यायची का ? , असा रोकडा सवाल या महिला विचारत होत्या . त्यांच्याशी बोलण्यासाठी सरपंचांचा मुलगा आला होता मात्र तोही समाधानकारक खुलासा करू न शकल्याने पुन्हा महिलांनी कडक भूमिका घेतली होती . या महिलांनी सरपंचांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आणि आमच्याकडून काहीच काम होणार नाही असे ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी लिहून द्यावे , अशी मागणी या महिलांनी केल्यावर ग्रामसेवकाने केलेला शिष्टाईचा प्रयत्नही अपयशी ठरला होता .
ग्रामसेवकाने आरोप फेटाळला ….
थकबाकीमुळे २ दिवसापूर्वी पाणीपुरवठा योजनेची वीज जोडणी तोडली आहे २ दिवसात थकलेल्या ९० हजार रुपये वीजबिलापैकी २० हजार बिल भरून आम्ही पाणीपुरवठा योजनेचे कनेक्शन सुरु करण्याचा प्रयत्न करू असे ग्रामसेवक शरद सूर्यवंशी यांनी ‘ केशरीराजशी बोलताना सांगितले , मात्र असले तरी ३३ दिवसांपासून पाणी पुरवठा थांबवला जाण्याचे नेमके कारण काय आहे ? हे स्पष्ट झाले नव्हते . ३३ दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याच्या या महिलांच्या आरोपात तथ्य नाही , असेही ग्रामसेवक शरद सूर्यवंशी म्हणाले .
महिलांच्या या उत्स्फूर्त आंदोलनात शोभाबाई कोळी , वंदना राठोड , मनीषा खैरनार , अनिता पाटील , संगीता पाटील यांच्यासह शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या .