जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील शिरसोली परिसरात एका शेतात बिबट्या दिसून आल्याने शेतकऱ्यांत खळबळ उडाली आहे. वन्यजीव विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
शनिवारी १८ रोजी रात्री ९ वाजेनंतर शिरसोलीत रात्री पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी प्रभाकर चिंधू आंबट्कर व त्यांचा मुलगा शेतात जात होते. तेव्हा एक बिबट्या त्यांना जाताना दिसला. यामुळे एकच खळबळ उडाली असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जिल्हा वन विभागाने याकडे लक्ष देऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
यापूर्वी देखील तालुक्यातील बेळी येथे एका बिबट्याने दोन शेळ्यांचा फडशा पाडला आहे. हाच तो बिबट्या शिरसोलीच्या शेतांमध्ये फिरत असल्याची शेतकऱ्यांना शंका आहे. त्यामुळे रात्री शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना भीती वाटत आहे.