नागपूर ( प्रतिनिधी ) – सज्ञान महिला सहमतीने शरीरसंबंध ठेवते. अशावेळी संबंधित पुरुषाला बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी धरता येणार नाही. असे स्पष्ट निर्देश सत्र न्यायालयाने दिलेत. न्यायाधीश सुनील पाटील यांनी हा निर्णय दिला.
आरोपी सागर चुन्नीलाल दडुरे हे महादुला येथील रहिवासी आहेत. सागर हे एका खासगी कार्यालयात नोकरी करतात. सागर शिक्षण घेत असताना त्यांची एका मुलीशी ओळख झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. त्यांनी एकमेकांच्या सहमतीने शरीरसंबंध ठेवले.
सागरचा आणि संबंधित महिलेचा लग्न करण्याचा विचार होता. पण, सागरच्या घरच्यांनी लग्नाला विरोध केला. त्यामुळं लग्न करू शकले नाही. सागरच्या आईवडिलांना ती मुलगी सून म्हणून नको होती. मुलाकडून लग्नास विरोध झाल्यानं संबंधित महिलेने अत्याचाराची तक्रार नोंदविली. सागरने माझ्यावर बलात्कार केला. माझी फसवणूक केली, अशी तक्रार पोलिसांत दिली.
दोन्ही वकिलांनी आपापली बाजू मांडली. न्यायालयात सागरचे वकील अॅड. आर. के. तिवारी यांनी सांगितले की, संबंधित महिलेने सहमतीने शरीरसंबंध ठेवले. सागरने काही जबरजस्ती केली नव्हती. सागरचा फसवणूक करण्याचा कोणताही उद्देश नव्हता. तिला लग्नाचे कोणतेही आमिष दिले नव्हते. हा दावा सिद्ध झाला. त्यामुळं न्यायालयाने सागरची निर्दोष सुटका केली. एखाद्या सज्ञान महिलेशी शरीरसंबंध म्हणजे बलात्कार नव्हे, असा निर्णय न्यायालयाने दिला. आधी सहमतीने संबंध ठेवायचे आणि नंतर बलात्काराची तक्रार करायची हे योग्य नव्हे, असं न्यायालयानं म्हटलं. आरोपीला निर्दोष सोडण्यात आले.