सोलापूर (वृत्तसंस्था) – राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होऊ लागले आहेत. एकूण ६ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींमध्ये कमळ फुलेल, असा विश्वास भारतीय जनता पक्षाकडून व्यक्त केला जात आहे. तर महाविकास आघाडीमधील प्रमुख नेत्यांनी आपले गड कायम राखले आहेत. मात्र सोलापुरमधील एका ग्रामपंचायत निवडणुकीत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवलेंच्या गटानं निर्भेळ यश मिळवलं आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अक्कलकोट तालुक्यातील बॅगेहळ्ळी ग्रामपंचायतीत त्यांचं पॅनल उतरवलं होतं. विजयकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली रिपाईंनं ही निवडणूक लढवली. गायकवाड यांनी या निवडणुकीचं अचूक नियोजन केलं होतं. घरोघरी जाऊन प्रचार करतानाच येथील मतदारांच्या समस्याही जाणून घेण्याचं काम गायकवाड यांनी केलं होतं. त्यामुळे रिपाईंचं पूर्ण पॅनल विजयी झालं आहे. बॅगेहळ्ळी ग्रामपंचायतीमधील ७ पैकी ७ जागा गायकवाड पॅनलला मिळाल्या आहेत. रिपाईंच्या या यशानं स्थानिक आघाडीतील काँग्रेस, भाजप सर्वपक्षीय गटांना धक्का बसला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील एकूण ६५७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी ६७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या तर ७ ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती मिळाली. त्यामुळे उर्वरीत ५८७ ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडलं होतं. सोलापुरातील उरलेल्या ग्रामपंचायतींच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. विशेष म्हणजे आठवले गट बॅगेहळ्ळीत निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने या निवडणुकीकडे सर्वांचं विशेष लक्ष होतं.







