नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – मागील काही महिन्यांपासून देशात महागाई सातत्याने वाढत आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात घाऊक महागाईचा दर १५.०८ टक्क्यांवर पोहोचला आहे. हा आकडा मागील दहा वर्षांतील सर्वाधिक आहे.
फेब्रुवारी महिन्यात घाऊक किंमत निर्देशांक १३.११ टक्क्यांवर, मार्चमध्ये हाच निर्देशांक १४.५५ टक्क्यांवर होता. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये घाऊक किंमत निर्देशांक १०.७४ टक्के इतका होता. मागील १३ महिन्यांपासून घाऊक महागाई दर दोन अंकी नोंदला आहे. त्यामुळे महागाईचं संकट किती भीषण आहे, याचा अंदाज बांधला जाऊ शकतो.
खनिज तेल, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, अन्नपदार्थ आणि रसायनांच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे एप्रिल महिन्यात महागाई दर वाढला असल्याचं सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. एप्रिलमध्ये खाद्यपदार्थांवरील महागाईचा दर ८.३५ टक्के नोंदला आहे. हाच दर मार्च महिन्यात ८.०६ टक्के होता. भाज्यांच्या किमतीत वाढ झाल्याने खाद्यपदार्थांवरील महागाई दर वाढला आहे.
एप्रिलमध्ये भाज्यांचा महागाई दर २३.२४ टक्के नोंदला आहे, हा दर मार्चमध्ये १९.८८ टक्के होता. एप्रिल महिन्यात बटाट्याचे भाव १९.८४ टक्क्यांनी वाढले तर कांद्याचे भाव ४.०२ टक्क्यांनी घसरले आहेत. फळांचा महागाई दर मार्चमध्ये १०.६२ टक्के होता. एप्रिलमध्ये हा दर १०.८९ टक्क्यांपर्यंत वाढला. गव्हाच्या किमतीत देखील १०.७० टक्क्यांनी वाढ दिसून आली आहे. अंडी, मांस आणि मासे यांच्या किमतीतही ४.५० टक्क्यांची वाढ नोंदली आहे.
इंधन आणि उर्जा क्षेत्रातील महागाई दरात ३८.६६ टक्क्यांची वाढ झाली आहे. हा दर मार्चमध्ये ३४.५२ टक्के होता. एलपीजी गॅसच्या किमतीत देखील ३८.४८ टक्क्यांची वाढ झाली आहे.