जळगाव (प्रतिनिधी) – एमआयडीसी परिसरातील रिद्धी-सिद्धी दालमिलमधून कंपाऊंडचे शटर वाकवून चोरट्यांनी पावणेतीन लाख रुपयाचे हरभरा डाळीचे ९८ गोण्या लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. रविवारी शामकांत श्रीराम पाटील (वय ४२, रा. सुप्रिम कॉलनी) यास अटक करण्यात आली. त्याला १७ नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणी ८ नोव्हेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मिश्रीलाला शिवलाल जावरकर (वय ४२, रा. रायपुर , कुसंुबा), रामसिंग रामप्रसाद शैलेकर (रा. बुटीखेडा, ता. खालवा, मध्यप्रदेश), नंदु नवल पाटील (वय ४९, रा. श्रीकृष्णनगर, जळगाव) या तीघांना अटक करण्यात आली होती. अयोध्यानगरातील रहिवासी प्रकाश शांतीलाल जोशी (वय – ४७) यांच्या कंपनीतून ही डाळ चोरी झाली होती. यातील रामसिंग, नंदु व शामकांत हे तीघे चोरीची डाळ विक्री करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तर जावरकर हा दालमिलमधील कर्मचारी असून त्याने पत्रा वाकवुन ही डाळ चोरी केली होती. त्यानंतर तीघांनी डाळ विक्री केली. या गुन्ह्यातील किरण भिमराव मोरे, (रा. निमगाव डाकु, ता. कर्जत, अहमदनगर) हा संशयित अद्याप बेपत्ता आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे तपास करीत आहेत.








