मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात सध्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन एकाच गोंधळ उडाला आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरु आहे. बीड जिल्ह्य़ातील परळी वैजनाथ येथील पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात भाजपाने थेट शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेतल्याने राज्य सरकार समोर नवे राजकीय संकट निर्माण झाले आहे. त्यातच आता भाजप आमदार व मुंबई प्रभारी अतुल भातखळकर यांनी आपल्याला धमक्यांचे फोन येत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान यानंतर आपल्याला धमक्या मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ठाकरे सरकार आल्यापासून झुंडशाही बळावली असल्याची टीका केली आहे. ‘पूजा चव्हाणच्या संशयास्पद आत्महत्येबाबत आवाज उठवल्यामुळे काल पासून धमक्यांचे फोन येतायत. ठाकरे सरकार आल्यापासून ही झुंडशाही बळावली आहे. धमक्यांनी बधणारा मी नाही हे सरकार प्रायोजित गुंडांनी लक्षात घ्यावे,’ असे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.
एकीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कुणाचे नाव न घेता चौकशीची मागणी करणारे पत्र पोलीस महासंचालकांना दिले असताना या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी थेट मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे. ‘पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात समाजमाध्यमांमध्ये ध्वनिफितीसुद्धा फिरत आहेत. त्यामुळे बंजारा समाजात प्रचंड अस्वस्थता असून याप्रकरणी सखोल चौकशी करावी,’ अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांकडे पत्र पाठवून केली होती.







