जळगाव (प्रतिनिधी) – प्रश्न पिण्याच्या पाण्याचा नसून देशातील सर्व सामान्यांचा सन्मानाने जगण्याचा आहे. या हेतूनेच महाडचा चवदार पाण्याचा लढा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. सर्वांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठा लढा दिला, असे प्रतिपादन प्रा.डॉ. लीलाधर पाटील यांनी केले.
येथील नूतन मराठा महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बोस सभागृहात साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल. पी. देशमुख अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून व्याख्याते प्रा. डॉ.लीलाधर पाटील, विद्यार्थी विकास अधीकारी प्रा.डॉ. एन. जे. पाटील, समन्वयक प्रा.डॉ.के. बी.पाटील, उपप्राचार्य प्रा.संजय पाटील, सहा.विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.राहुल संदनशिव उपस्थित होते.मान्यवरांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले.
प्रास्ताविक प्रा.डॉ राहुल संदनशिव यांनी केले. व्याख्याते डॉ. लिलाधर पाटील यांनी, “जागृतीचा अग्नी अखंड तेवत ठेवा” या विषयावर व्याख्यान दिले. भारताला महापुरुषांना जातीजातीत आणि धर्माधर्मात वाटून घेण्याचा मोठा आजार लागलेला आहे असे सांगितले. जे देशासाठी घातक आहे, असे त्यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेबांनी शिका, संघर्ष करा आणि संघटीत व्हा असे सांगितले. परंतू त्यातून योग्य तो बोध घेत नाही, असे ते म्हणाले.
प्राध्यापकांनी अध्यापन,स्वयं अध्ययन, संशोधन-ज्ञाननिर्मिती आणि ज्ञानवृद्धी अशा प्रवासाने वाटचाल केली पाहिजे. महारवतन, महापुरुषांना देवत्व बहाल करणे, मनुस्मृती दहन, उत्तर कालखंड, वारकरी संप्रदाय, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. आंबेडकर वारसा अशा अनेक बाबींवर त्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी करत प्रकाश टाकला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल. पी. देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या खानदेशातील प्रवासावर दृष्टीक्षेप टाकताना जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या शैक्षणिक कार्यासंबधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी माहिती घेतल्याचे सांगितले. महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीनिमित्त ५० महापुरुषांची ५० व्याख्यान आयोजित करण्याचा मानस देखील त्यांनी बोलून दाखविला. सूत्रसंचालन प्रा.डॉ.अफाक शेख यांनी तर आभार प्रा. डॉ. जे. पी. सोनटक्के यांनी मानले. यावेळी महाविद्यालयतील प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.