जळगाव ( प्रतिनिधी ) – व्हॉट्सॲप चॉटींग करून तरूणाकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून गळफास घेतलेल्या २१ वर्षीय तरूणीची प्राणज्योत मालविली. त्रास देणारा तरूण व त्याची आई यांना अटक करावी या मागणीचे निवेदन मयत तरूणीच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिले. दिव्या दिलीप जाधव (वय-२१, रा. तारखेडा ता. पाचोरा ) असे मयत तरूणीचे नाव आहे.
दिव्या जाधवचे आईवडील मजूरी करून उदरनिर्वाह करतात. गावातील निलेश मंगलसिंग गायकवाड याच्यासोबत दिव्याची ओळख होती. निलेश लग्नाचे आमिष दाखवून दिव्याची दिशाभूल करत होता. दोन वर्षांपासून लग्न करणार आहे की नाही याबाबत कोणताही खुलासा देत नव्हता. दोघे एकाच समाजाचे असल्याने चार लोकांना बोलावून मुलासह त्याची आई लक्ष्मीबाई मंगलसिंग गायकवाड यांना समजविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अश्लिल भाषा वापरून लग्नास मनाई केली होती . असे असतांना दिव्याचे आईवडील शेतात कामाला गेल्यानंतर पुन्हा निलेश गायकवाड दिव्याला वारंवार फोन व व्हॉटसॲपवर चॅटींग करत होता. दोघांचे सोबतचे फोटो व कॉल रेकॉर्डींग व्हायरल करण्याची धमकी देत होता. निलेशकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून दिव्याने २४ जून रोजी दुपारी घरात गळफास घेतला. नातेवाईकांनी तिला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविले. १३ जुलै रोजी सकाळी दिव्याची प्राणज्योती मालविली.
मुलीचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आक्रोश केला निलेश गायकवाड आणि त्याची आई लक्ष्मीबाई गायकवाड यांना अटक करा, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा दिव्याचे आईवडील व काका यांनी घेतला जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना मागणीचे निवेदन दिले आहे.