नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी तिसऱ्या आत्मनिर्भर पॅकेजची घोषणा केली आहे. कोरोना काळात भारतीय अर्थव्यवस्थेला आणखी मजबूत करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असून कोरोना संक्रमण देशात वाढत आहे. आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी यासंदर्भात माहिती दिली. कोरोनाविरुद्ध लढणे हे सर्वात मोठे आव्हान होते. आवश्यक उपाययोजना केल्यामुळे भारताची अर्थव्यवस्था सावरत असल्याचेह निर्मला सीतारमण यांनी सांगितले.
ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत अर्थव्यवस्था आणखी सुधारेल असा विश्वासदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्याचबरोबर बँक क्रेडिटमध्ये 5.1 टक्के वाढ झाली. तर आरबीआयने भारतीय अर्थव्यवस्था चांगलं काम करत असल्याचा संकेत दिले आहेत अशी माहिती निर्मला सीतारमण यांनी दिली.
कोरोनानंतर भारताचा रिकव्हरी पाहून मूडीजने आपला अंदाज बदलला. यापूर्वी मूडीजने यंदाच्या आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी उणे (मायनस) 9.6 टक्के राहील असे सांगितले होते. मात्र, आता बदल करून तो यंदाच्या वर्षात उणे 8.9 टक्के राहील असे सांगितले आहे. तर पुढील आर्थिक वर्षासाठी यापूर्वी मुडीजने 8.1 विकासदर अंदाज वर्तवला होता. तो आता बदल करून 8.6 टक्के असा सांगितला आहे.