यावल (प्रतिनिधी) – तालुक्यातील कोळवद गावातील एका आदीवासी कुटुंबातील चिमकुलीस विजेचा धक्का लागल्याने तिचा मृत्यु झाल्याची दुदैवी घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कोळवद या गावात राहणारे संजय बिस्मिल्ला तडवी यांची मुस्कान संजय तडवी (वय १४) ही अल्पवयीन मुलगी शुक्रवार १२ मे रोजी सकाळी साडेआठ ते नऊ वाजेच्या दरम्यान आपल्या घरातील पाणी भरण्यासाठी पाण्याची मोटर लावत होती. तिला मोटारीत विजेचा प्रवाह उतरल्याने विजेचा धक्का लागून तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मुस्कान तडवी ही १४ वर्ष वयाची चिमकुली विकास विद्यालय सातोद ता. यावल येथे आठवीचे शिक्षण घेत होती. विजेचा धक्का लागल्याने तिच्या कुटुंबाने गावातील मंडळीच्या मदतीने तात्काळ तिला यावल येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणाले असता तिला वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. मयत मुस्कान तडवी ही अत्यंत गरीब आदिवासी कुटुंबातील संजय बिस्मिल्ला तडवी यांच्या कुटुंबातील मुलगी होती. तिच्या अशा अपघाती मृत्यु झाल्याने गावात सर्वत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सदर या मरण पावलेल्या चिमकुलीच्या आदीवासी कुटुंबास शासनाकडून काहीतरी मदत मिळाल्यास कुटुंबाला हातभार लागेल अशी अपेक्षा परिसरातील ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.