मुंबई (वृत्तसंस्था) – आयपीएल २०२० चा अंतिम सामना मंगळवारी (१० नोव्हेंबर) संपन्न झाला. मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर पाच गड्यांनी मात करत सलग दुसऱ्या वर्षी आयपीएलचे विजेतेपद पटकावले. रोहित शर्माने आपल्या कल्पक नेतृत्वाच्या जोरावर पाचव्यांदा मुंबईला आयपीएलचा विजेता बनवले. मात्र, या निर्णायक सामन्यात दिल्लीच्या डावातील चौथे षटक सुरू असताना; अशी घटना घडली, ज्यामुळे भारताचे दिग्गज फलंदाज आणि समालोचक सुनील गावसकर यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली.
अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सामन्यातील पहिल्या चेंडूवर ट्रेंट बोल्टने दिल्लीचा सलामीवीर मार्कस स्टॉयनिसला यष्टीरक्षक क्विंटन डी कॉककरवी झेलबाद करून मुंबईला सनसनाटी सुरुवात दिली. जसप्रीत बुमराहने दुसरे षटकदेखील किफायतशीर टाकून, दिल्लीच्या फलंदाजांवरील दबाव वाढवला. परिणामी, बोल्टने टाकलेल्या तिसऱ्या षटकात अजिंक्य रहाणेदेखील तंबूत परतला. खेळपट्टी वेगवान गोलंदाजीला साथ देत असल्याने, चौथ्या षटकात जसप्रीत बुमराह गोलंदाजी करताना दिसेल अशी सर्वांची अपेक्षा होती, पण तसे झाले नाही.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने सर्वांना चकित करत; चौथे षटक टाकण्यासाठी चेंडू ऑफस्पिनर जयंत यादवच्या हाती सोपवला. त्यावेळी, प्रसारण वाहिनीसाठी माजी भारतीय कसोटी खेळाडू आकाश चोप्रा व माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर हे समालोचन करत होते. जयंत यादव गोलंदाजीसाठी आला असता; आकाश चोप्राने गावसकर यांना विचारले की, “हे षटक बुमराहला न देता जयंतला देण्याचा निर्णय कसा आहे?”
यावर गावसकर यांनी झटकन उत्तर देताना म्हटले की, “हा अगदी चुकीचा निर्णय आहे. मला कर्णधार रोहित शर्माकडून याची अपेक्षा नव्हती. तुम्ही वेगवान गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असताना; असा निर्णय कसा घेऊ शकता ?
गावसकर हे रोहितच्या या निर्णयावर टीका करत असतानाच, जयंत यादवने षटकातील तिसर्या चेंडूवर शिखर धवनला त्रिफळाचीत केले आणि कर्णधार रोहित शर्माचा निर्णय योग्य ठरवला.
जयंतने शिखरला बाद करताच टीका करत असलेल्या गावसकर यांचे सूर बदलले. ते रोहित शर्माच्या नेतृत्वगुणांचे कौतुक करू लागले. धवन बाद झाल्यावर गावसकर म्हणाले, “रोहित शर्मा अनुभवी कर्णधार आहे. आपण समालोचन कक्षात बसून काही गोष्टींचा अंदाज लावू शकतो. मात्र, मैदानावर कर्णधार सर्व परिस्थिती पाहत असतो. रोहितने मला खोटे ठरवले. आता मी काही बोलणार नाही.”
गावसकर त्यांच्या पाठोपाठ इतर दोन समालोचक आकाश चोप्रा व अजित आगरकर हेदेखील रोहितच्या जयंतला चौथे षटक देण्याच्या निर्णयाचे कौतुक करताना दिसून आले.
तत्पूर्वी, संपूर्ण हंगामात चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या युवा लेगस्पिनर राहुल चाहरला वगळून, अनुभवी ऑफस्पिनर जयंत यादवला अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने संधी दिली होती. कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत जयंतने निर्णायक सामन्यात ४ षटके टाकताना २५ धावा देत एक बळी मिळविला.